पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नसोहळा आयोजित केला. परंतु, लग्न समारंभ सुरू असतानाच सभागृहातील झुंबर कोसळून लग्न समारंभाचा बेरंग झाला. हॉटेल प्रशासन तक्रारदारांना योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडले, असा ठपका ठेवून जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने मुंबई उपनगरातील पंचतारांकित हॉटेलला दोषी ठरवले. तसेच, भरपाई म्हणून दोन लाख ७० हजार रुपये तक्रारदार वधूला देण्याचे आदेश दिले. दादर पश्चिमस्थित किम्बर्ले डायस यांच्या तक्रारीवर आयोगाने हे आदेश दिले. हॉटेल प्रशासनाला डायस यांच्या तक्रारीवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हॉटेल प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, आयोगाने डायस यांच्या तक्रारीवर एकतर्फी निर्णय देऊन हॉटेल व्यवस्थापनाला दोषी ठरवले व दंड सुनावला.
