राज्यासह मुंबईत देखील अनेक नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. यावेळी नागरिकही पावसाच्या अपेक्षेत आहेत. दरम्यान मुंबईकरांसाठी यावेळी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे अलीकडच्या आठवड्यातील उच्च तापमानापासून दिलासा मिळू शकतो.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत 10-11 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा वेळेच्या आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. याशिवाय तो वेगाने पुढे सरकत असून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईकर उकाड्याने हैराण
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. मुंबईकरांना देखील बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. यावेली काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उष्णतेचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागला. अशातच आता पुढील तीन- चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशातही नागरिक उकाड्याने हैराण
देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान वाढल्याचं चित्र आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना दिसतायत. अशातच असून सोमवारी देशातील 17 ठिकाणी तापमान 48 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचंही दिसून आलं. दरम्यान, दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
