वसई:जिवंत महिला मतदान केंद्रावर ठरली ‘मयत’

पालघर लोकसभा मतदार संघातील अनेक मतदारांची नावे याद्यांममधून गायब झाली असतानाच नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे मतदान केंद्रावर गेलेल्या जिवंत महिलेला मयत ठरविले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशीला राजाराम पाटील असे वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.

सोमवारी पालघर लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदार याद्यामधील घोळ यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.नायगाव पूर्वेच्या जूचंद्र मतदान केंद्रावर ही नावे यादीत नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. तर दुसरीकडे जिवंत असलेल्या महिलेला  मतदार यादीत मयत घोषित केल्याने मतदान केंद्रावर गेलेल्या महिलेला मतदान करता आले नाही.

सुशीला राजाराम पाटील (७२) ही महिला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मतदान केंद्रावर आधारकार्ड व मतदान ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. मात्र मतदान केंद्रात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी तू मयत असल्याने तुला मतदान करता येणार नाही असे या महिलेला सांगण्यात आले आहे.

मी जिवंत आहे असे असताना मला मयत घोषित कसे काय केले असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे. मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावावा यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जाते मात्र मतदान केंद्रावर गेल्यावर जर जिवंत व्यक्ती मयत दाखविली जात असेल तर कसे मतदान होईल असा प्रश्न या महिलेच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. जिवंत असलेल्या महिलेला मतदान केंद्रावर मयत ठरविल्याने निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *