लांब रांगा, मतदान यंत्रात बिघाड, वीजपुरवठा खंडित; विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबईतील सहा मतदारसंघांत सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली असून सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये झालेला बिघाड, मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी आल्यामुळे लागलेल्या लांबच लांब रांगा, मतदारयादीतील घोळ, तर कुठे खंडित झालेला वीजपुरवठा अशा विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले.

मानखुर्दमध्ये, मुलुंड आणि भांडुप येथे मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळे

मानखुर्द येथील बूथ क्रमांक ६३ आणि ६५ वरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. मुलुंड येथील बूथ क्रमांक १२६ वरील मतदान यंत्रातही बिघाड झाला होता, मात्र तत्काळ दुरुस्ती केल्यानंतर तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले. भांडुप खिंडीपाडा परिसरातील मतदान केंद्रावरील विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने मतदान बंद पडले होते.

लांबच लांब रांगा

घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी, बर्वेनगर, पारशीवाडी, चिरागनगर, माणिकलाल मैदान, जागृती नगर, श्रेयस दामोदर पार्क, अग्निशामक दल पार्कसाईट आणि विक्रोळी पार्कसाईट येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतरही मतदान केंद्रांवर अशीच परिस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *