मुंबई ते मांडवा जलवाहतुक २६ मे पासून बंद होणार

मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतुक सेवा २६ मे पासून बंद होणार आहे. पावासाळ्याच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मेरीटाईम बोर्डाने जारी केले आहे. दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रो रो जलवाहतुक सेवा नियमितपणे सुरु राहणार आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया ते मांडवा दरम्यान जल प्रवासी वाहतुक केली जाते. पिएनपी, मालदार आणि अजंठा अशा तीन खाजगी ऑपरेटर्स मार्फत जल वाहतूक सेवा पुरवली जाते. दरवर्षी या मार्गावरून साधारणपणे १२ लाख प्रवासी मार्गावरून ये जा करत असतात. कोकणातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेला हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो. या शिवाय या मार्गावरून खाजगी स्पीड बोटींची मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते.

पावसाळ्यात प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही जल वाहतूक बंद ठेवण्यात येते. या काळात समुद्र खळवळलेला असल्याने बोटींना धोका उद्भवू शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने ही बोट सेवा बंद ठेवण्यात येत असते. यंदा २६ मे पासून या मार्गावरील सर्व बोटसेवा बंद करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत. त्यानुसार गेट वे ऑफ इंडीया ते मांडवा दरम्यान चालणारी बोट सेवा बंद करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *