डोंबिवलीतील प्रवाशाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान मृत्यू

येथील पश्चिमेतील नवापाडा श्रीधर म्हात्रे वाडी भागात राहत असलेल्या राहुल पुरुषोत्तम अष्टेकर (४९) यांचा शनिवारी दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवडाभर डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांंदरम्यान प्रवाशांचे लोकलमधील गर्दीमुळे पडून मृत्यू होत आहेत या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संंघटनेचे पदाधिकारी नंदकुमार देशमुख, लता अरगडे, जगदीश धनगर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश राऊत प्रयत्नशील आहेत. प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे नव्हे तर रेल्वेच्या गलथानपणाचे हे बळी आहेत, अशी टीका आता रेल्वे प्रवाशांंकडून करण्यात येत आहे.

गेल्या तीन दिवसाच्या कालावधीत डोंबिवलीतील अवधेश दुबे, रिया राजगोर या दोन प्रवाशांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. उशीरा धावणाऱ्या लोकल, वातानुकूलित लोकलमध्ये सामान्य लोकलप्रमाणे होणारी गर्दी आणि कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी प्रवाशांंची होणारी तगमग ही कारणेही या अपघातामागे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

डोंंबिवली, कोपर, दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे, याचा विचार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक समिती नेमावी आणि त्यावर प्राधान्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *