घनकचरा प्रकल्पाला लागणाऱ्या आगीचा उत्तनच्या आंबा उत्पादनाला फटका

महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाला सातत्याने आगी लागत आहेत. या आगीच्या झळा या आंब्याच्या झाडांना बसून त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. यात आंब्याचा मोठ्या प्रमाणात मोहर जळून गेल्याने सुमारे ७० टक्के इतके उत्पादन घटले आहे.

भाईंदर पश्चिम येथील उत्तन परीसरात असलेल्या भुभागात अनेक वर्षांपासून आंब्याची लागवड केली जाते. कोकण किनारपट्टीवरील या आंब्याला उत्तनचा राजा अशी ओळख आहे.महत्वाचे बाब म्हणजे हा आंबा अत्यंत उशिरा मे महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे या याची विशेष मागणी असते.मात्र यंदा पडलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच घनकचरा प्रकल्पातुन पसरणाऱ्या प्रदूषणामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

उत्तनच्या धारावी डोंगरावर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे.मागील कित्येक वर्षांपासून या प्रकल्पात आठ लाख मेट्रिक टन कचऱ्याचा डोंगर साचलेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे कचऱ्यात तयार होणाऱ्या रासायनिक वायूमुळे सातत्याने कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना घडत आहे. हा प्रकल्प उंचठिकाणी असल्याने या आगीचे लोळ वाहत्या वाऱ्यासोबत आजूबाजूच्या भागात पसरतात.

आजूबाजूला फळबागायत दारांनी लागवड करण्यात आलेल्या आंब्याच्या झाडांना त्याच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. या झळामुळे आंब्यांच्या झाडांना आलेला मोहर सुद्धा जळून गेला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात लागलेल्या अशाच आगीचा धूर पसरून उत्तनच्या बागेतील आंब्याची मोहर जळून गेला होता. त्यामुळे जवळपास ७० टक्के आंब्याचे उत्पादन नष्ट झाल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित ३० टक्के आंबे देखील महिना भर सुरक्षित राहतील की नाही अशी भीती सतावत असल्याची प्रतिक्रिया बागायतदार प्रशांत शहा यांनी व्यक्त केली आहे.

नुकसान भरपाईची मागणी

उत्तन येथील परिसरलेल्या पट्ट्यात अनेक बागायतदार आंब्याचे उत्त्पन्न घेतात. या भागात अनेक पर्यटनस्थळे असल्याने स्थानिक नागरिक देखील आंब्याची विक्री करून आपली उपजीविका भागवतात.त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील प्रदूषणामुळे आंब्याचे घटलेले उत्त्पन्न हे प्रत्यक्ष रित्या येथील बागायतदारांना मोठे नुकसानकारक आहे.शिवाय आंब्याच्या लागवडी करीता केलेला खर्च देखील भरून निघत नसल्यामुळे पुढच्या वर्षी उत्त्पन्न घेणे बागायतदाराना कठीण होणार आहे.म्हणून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून महापालिकेने हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढाकार घ्यावा,मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.

घाऊक बाजारापासून वंचित

घनकचरा प्रकल्पातुन पसरलेल्या प्रदूषणामुळे आंब्याच्या पिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा बागायतदारांना ३० टक्केच आंब्याचे उत्पन्न मिळणार आहे.मात्र हा आंबा मे महिन्याच्या अंती पिकत असल्याने तसेच त्यावर प्रदूषणाचा सावट असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनी आंबा खरेदी कडे पाठ फिरवली आहे. परिणामी हा आंबा घाऊक बाजारापासून वंचित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *