जलसंपदा विभाग आणि महापालिकेतील संघर्ष; ४० कोटींची थकीत पाणीपट्टी, पालिकेवर कठोर कारवाई होणार?

थकीत पाणीपट्टीमुळे जलसंपदा विभाग पालिकेवर कठोर कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाईची कुणकुण लागल्यामुळे पालिकेचे प्रशासन चिंतेत असल्याचे मानले जात आहे.शहरवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा केला जातो. महापालिकेला देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टी आकारली जाते. दर महिन्याला सुमारे ३० लाख रुपयांची पाणीपट्टी पालिकेला भरावी लागते. पालिकेने २०१५-१६ या वर्षांपासून जलसंपदा विभागाची पाणीपट्टी भरलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी १५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यावर जलसंपदा विभागाने २५ कोटी रुपयांचे व्याज लावले आहे. त्यामुळे व्याजासह ४० कोटी रुपयांची पाणीपट्टी पालिकेला भरावी लागणार आहे.

पाणीपट्टी न भरल्यामुळे जलसंपदा विभागाने यापूर्वी पालिकेचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात संघर्षदेखील निर्माण झाला होता. आता ४० कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी जलसपंदा विभाग पुन्हा एकदा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीच्या काळात अशी कठोर कारवाई जलसंपदा विभागाकडून होण्याची शक्यता कमी आहे; पण निवडणूक संपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेचे प्रशासन चिंतेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *