अलिबाग- पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा वरंध घाटाच्या दुपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी दोन महिन्यांसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी ताम्हणी घाट अथवा आंबेनळी घाट या पर्यायी मार्गांचा वापर करावा यासाठीची वाहतुक अधिसुचना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
महाडकडून पुण्याकडे जाणाऱ्या वरंध घाटात राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांचे मार्फत वरंध घाट ते रायगड जिल्हा हद्द या दरम्यान संरक्षक भिंत आणि रस्ता दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. अरुंद रस्ता आणि खोल दरी असल्याने या ठिकाणी काम करणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे वाहतुक नियमित सुरू ठेऊन रस्त्याचे काम करणे आव्हानात्मक ठरणार होते. तसेच या परिस्थितीत वाहतुक सुरू ठेवणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या कालावधीत या मार्गावरील वाहतुक रस्ता दुरुस्तीच्या कामांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची वाहतुक अधिसुचना रायगड जिल्हाधिकारी यांचे मार्फत जारी करण्यात आली आहे.
याकालावधीत रायगड मधून पुण्यात जाणाऱ्या आणि पुण्यातून रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, प्रवासी आणि वाहनचालक यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवाश्यांनी ताम्हणी घाट अथवा आंबेनळी घाटांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची अधिसुचना जिल्हाधिकारी जावळे यांनी जारी केली आहे.
