उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट; दोन्ही धरणांनी तळ गाठला

तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. तालुका आणि उरण शहरातील पाणीकपातीनंतरही ऐन उन्हाळ्यातच उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट आणखी गहिरे झाले आहे. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने मात्र शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पावणेदोनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या उरण नगर परिषदेची पाणीपुरवठ्याची स्वत:ची अशी कोणतीही योजना नाही. त्यामुळे उरण नगर परिषद एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन शहरवासीयांना पाणीपुरवठा करीत आहे. उरण नगर परिषदेची लोकसंख्या ४० हजारांच्या आसपास आहे. उरण कोटगाव ते मोरा या दरम्यान असलेल्या विविध २१ प्रभागांत राहणाऱ्या शहरवासीयांना पावसाळ्यानंतर नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरासह उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने तळ गाठला आहे. यामुळे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने मागील सहा महिन्यांपासूनच मंगळवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस पाणीकपात लागू केली आहे. त्यानंतरही आठवड्यातील पाच दिवस शहरवासीयांना फक्त दिवसात एकच तास पाणी दिले जाते. नियोजनाचा अभाव आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे पाणीटंचाईची समस्या शहरवासीयांना याआधीही भेडसावत होती. त्यातच उष्णतेचा पारा चढा असल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामानाने उरण नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांच्या आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होत नाही. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. उरण शहरातील ४० हजार नागरिकांसाठी दररोज ५० लाख लिटर पाण्याची गरज आहे. पाणी सोडण्यात आल्यानंतरही रिकामी पाइपलाइन भरण्यासाठी बराच वेळ जातो. यामुळे शहरातील नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असा दावा उरण नगर परिषदेचे वरिष्ठ अभियंता झेड. आर. माने यांनी केला आहे.

१०-१५ दिवसांत एकदाच फक्त एक तासच पाणी जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर तर होडीने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तालुक्यातील २५ ग्रामपंचायती व औद्याोगिक क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे. तर पूर्व विभागातील १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातही पाणीसाठा आटल्याने उरण परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायती आणि औद्याोगिक प्रकल्प मिळून सुमारे दोन लाख लोकसंख्येला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अपुऱ्या पावसामुळे या वर्षी रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *