महायुतीत काही जागांचा तिढा कायम; तीन पक्षांकडून ३४ उमेदवार जाहीर

महायुतीमध्ये काही जागांबाबत वाद असल्याने अंतिम जागावाटपाचा तिढा कायम आहे. मात्र भाजपने २३, शिवसेनेने (शिंदे गट) ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) तीन असे एकूण ३४ उमेदवार घोषित केले आहेत. उर्वरित जागांपैकी नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई, सातारा, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर अद्याप रस्सीखेच सुरु असून काही जागांवर दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे.

महायुतीचे जागावाटप गुरुवारी केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा जाहीर करूनही ते अंतिम होऊ शकलेले नाही. महायुतीमध्ये जागावाटपात रस्सीखेच सुरू असून जागावाटप अंतिम करण्यासंदर्भात पवार यांनी याआधीही दोन-तीन वेळा तारखा जाहीर केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी सर्व ४८ जागांचे वाटप जाहीर करू, असे पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात जाहीर केले होते.

’ नाशिकच्या जागेवरून वाद असून शिवसेना खासदार हेमंत गोडसे हे उमेदवारी मिळविण्यासाठी आक्रमक आहेत. तर त्यांना भाजप नेत्यांचा विरोध असून ही जागा त्यांना हवी आहे.

’ शिर्डीची जागा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मागितली होती. पण शिंदे यांनी त्यास नकार देत सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

’ परभणीची जागा भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्याचा प्रस्ताव आहे. पण शिवसेना त्यास तयार नाही. .

बैठकांचे सत्र

जागावाटपासाठी फडणवीस यांनी गुरुवारी शिंदे-पवार यांच्याशी सकाळी चर्चा केली आणि त्यानंतर शिवसेनेने सायंकाळी आठ उमेदवारांची घोषणा केली. उमेदवार निश्चिती आणि नाराज नेत्यांची समजूत घालण्यासाठी बैठकांचे सत्र शिंदे-फडणवीस यांच्याकडे दिवसभर सुरू होते. फडणवीस यांच्याकडे शुक्रवारीही निवडणूक प्रचारासह अन्य मुद्दय़ांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *