घोडबंदर मार्गावर मदत मागूनही वाहन चालक थांबले नाहीत, अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू

घोडबंदर मार्गावर बुधवारी भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात महिलेचा मृत्यू झाला. तिचे पती राजीव (३७) या घटनेत जखमी झाले. अक्षता थानवी (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर राजीव यांनी मदतीसाठी अनेक वाहन चालकांना विनंती केली. परंतु कोणतेही वाहन त्यांच्याजवळ थांबले नाही.

मिरारोड भागात अक्षता थानवी या त्यांचे पती राजीव, मुलगा जीत (११) यांच्यासोबत राहात होत्या. अक्षता आणि राजीव हे दोघेही घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका खासगी कंपनीत कामाला आहेत. बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास राजीव आणि अक्षता हे त्यांच्या दुचाकीने मिरारोड येथून ठाण्याच्या दिशेने कामाला जाण्यासाठी निघाले होते. पहाटे ४ वाजताच्या सुमारास ते घोडबंदर मार्गावरील भाईंदर परिसरात आले असता, मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे राजीव यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. राजीव आणि अक्षता हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अक्षता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता. राजीव यांच्या देखील हाताला दुखापत झाली. राजीव हे मार्गावरून वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना थांबण्याची विनंती करत होते. परंतु कोणतेही वाहन त्यांच्या मदतीसाठी थांबले नाही. अखेर राजीव यांनी त्यांच्या आई आणि कार्यालयातील सहकाऱ्यांना संपर्क साधला. तसेच १०० क्रमांकावर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी अक्षता यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *