ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील महिलांनाच तिकीटावर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये खटके उडत होते. अखेर ठाणे महापालिकेने हे नियम मागे घेतले असून बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत देण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महिलांकडून वास्तव्याचा पुरावा मागू नये अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसगाडीतील प्रवास विनामूल्य असून त्यांना सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे.

ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात टीएमटी बसगाड्यांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ही सवलत महापालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या म्हणजेच, ठाणे ते दिवा शहरातील महिलांनाच लागू करण्यात आली होती. ठाणे शहरात कल्याण, बदलापूर तसेच विविध भागातून महिला कामानिमित्ताने येत असतात. वागळे इस्टेट, कासारवडवली भागात शहरात जिल्हा शासकीय रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला देखील उपचारासाठी येत असतात. ही सवलत केवळ ठाणे महापालिका हद्दीतील महिलांसाठीच असल्यामुळे हद्दीबाहेरील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.