जनसंवाद’ अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे मुंबईकडे; म्हणाले, मनोहर जोशी…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने आपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे हे आज मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त येताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याचा दौरा स्थगित केला. ते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, वरुण सरदेसाई या सहकाऱ्यांसह संभाजीनगरकडे रवाना झाले. तेथून ते ‘चार्टर प्लेन’ने मुंबईला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंनी काल गुरुवारी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे जनसंवाद सभा घेतल्या. रात्री ते शेगावमध्ये मुक्कामाला होते. आज शुक्रवारी (दि २३) सकाळी पक्ष प्रमुखांनी गजानन महाराज संस्थान मंदिरातील समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत खासदार, विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दौरा स्थगित झाल्याने आजच्या खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा येथील सभा रद्ध झाल्या.

दरम्यान मुंबईला रवाना होण्यापूर्वी ठाकरे यांनी माध्यमांशी संक्षिप्त संवाद साधला. मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष यापेक्षा त्यांचे निष्ठावान सैनिक असणे महत्वाचे ठरले. संकटाच्या काळात देखील ते एकनिष्ठपणे शिवसेने सोबत राहिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या, मनोहर जोशी यांच्यासारख्या पहिल्या फळीतील नेत्यांनी शिवसेना रुजविण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. त्यांची प्रेरणा घेऊनच सध्याच्या कठीण काळात शिवसेना पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत आहे. या शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *