बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आपल्या मुलासह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील कांदा चाळीतच गळ्याला दोर लावत पिता-पुत्राने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे बळीराजाच्या आत्महत्येच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पारखेड येथील शेत शिवारात संतोष हरिश्चंद्र गावंडे (वय 55) व त्यांचा मुलगा अक्षय संतोष गावंडे (30) रा. पारखेड या दोघांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील कांद्याच्या टीन शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहिती मिळताच तात्काळ खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह खामगाव सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवले आहेत. एकाच वेळी पिता-पुत्राने स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे दोघांनीही जीवन संपवल्याच समोर येत आहे. मात्र पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळे वस्तीवर राहणारे सखाराम किसन जाधव यांचा रविवारी वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आजारी सखाराम जाधव यांच्यासाठी ॲम्बुलन्स मागवण्यात आली, पण ती वस्तीपर्यंत पोहोचूच शकली नाही. व्यवस्थित रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका पोहचू शकली नाही. शेवटी रस्त्याची सोय नसल्याने कुटुंबीयांनी सखाराम जाधव यांना बैलगाडीत घालून दोन किलोमीटर अंतरापर्यंत आणण्याची कसरत केली. पण, या सरकारी आणि प्रशासकीय विलंबातच सखाराम यांची प्राणज्योत मालवली.
अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणेप्रकरणी अजून 2 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन न उगवल्याच्या प्राप्त तक्रारीनंतर 5 तालुक्यात आतापर्यंत 13 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच अहवालात समोर आलं होते. रात्री उशिरा अकोला सिटी कोतवाली आणि बाळापुर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यत एकत्रित 13 सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठ दिवस पहिले 2 कंपन्यांवर आणि दोन दिवस आधी 9 कंपन्यावर दाखल करण्यात आले होते आणि रात्री अजून 2 सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत अकोला जिल्हात 13 सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
