“मुलींना मोफत शिक्षण, स्थानिक पातळीवर निवडणुका स्वतंत्र होतील”, अजित पवार यांचे सूतोवाच

राज्यात लवकरच ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक मेळाव्यात दिली. नवी मुंबईत रविवारी पार पडलेल्या या मेळाव्यात वक्फ बोर्डबाबत अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचीही माहिती त्यांनी दिली. या वर्षी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी १५०० कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे आम्ही सरकारमध्ये सामील झालो असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबाबत मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्दे स्पष्ट केले. अल्पसंख्याक लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचे कार्य केले आहे. काही लोक मुस्लिम समुदायात भयाचे वातावरण निर्माण करून आपली राजनीती चालवतात. आम्ही सर्व एकसाथ मिळून राज्य करीत आहोत. राज्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आम्ही अल्पसंख्याक जनतेचा आदर करतो, त्यांना प्रतिनिधित्व देतो. असे सांगत त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी मुस्लिम लोकांना दिलेल्या प्रतिधित्वाची यादीच वाचून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर मुस्लिम समाजाने कायम विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. विकास कार्यात सर्वांना सोबत घेऊन जाणार आहेत. बाबा सिद्दीकी काही दिवसांपूर्वी आमच्या सोबत आले. त्यांच्या मदतीने मुस्लिम समाजाचे प्रश्न अधिक स्पष्ट होऊन उपायोजना करता येईल. मुस्लिम युवतींना शिक्षणात मदत केली जाईल

वक्फ बोर्ड जमिनीबाबत अनेक समस्या आहेत. असे काही लोकांनी आम्हाला सांगितले. वक्फ बोर्ड जमिनीबाबत लक्ष घेत समस्या सोडवा अशी मागणी काही लोकांनी केली आहे. याबाबत काही सूचनाही आम्ही दिल्या आहेत.राज्य सरकार याबाबत प्रयत्नशील आहे. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी गेल्या वर्षी ५०० कोटी रूपये दिले. या वर्षी १५०० कोटी देण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी उर्दू हाऊस नांदेड, नागपूर, मालेगाव, सोलापूर येथे स्थापन केले. यापुढे छत्रपती संभाजी नगर, भिवंडी, परभणी, धुळे येथेही उर्दू हाऊस निर्माण करणे विचाराधीन आहे. काही लोक तुम्हाला आम्ही विचारधारा सोडली सांगतील, मात्र हे खरे नाही . काही दिवसांपूर्वी सातारा येथे दोन समुदायात दंगल झाली. मी स्वतः पीडित लोकांना भेटलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *