गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचा मोठा फटका अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारापासून वंचित असलेल्या सुमारे ५८ लाख बालकांना तसेच जवळपास १० लाख गर्भवती महिला व स्तनदा मातांना बसत आहे. पुरेसा पोषण आहार मिळत नसल्यामुळे लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून (नवीन शासकीय भाषेत तीव्र कमी वजनाची बालके) ७८,४३७ एवढी झाली आहे.
राज्यात सुमारे ९३ हजार अंगणवाड्या असून दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत. तर या अंगणवाड्यांमध्ये आजघडीला ५८ लाखांहून अधिक बालके आहेत. ० ते सहा वर्षे वयोगटापर्यंतच्या या बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य विषयक तपासणी केली जाते. या बालकांचे नियमित वजन करण्यात येऊन कुपोषित व तीव्र कुपोषित असे वर्गीकरण करून त्यानुसार अशा बालकांसाठी अधिकचा सकस आहार देण्यात येतो. सध्या अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपये मानधन देण्यात येते तर मदतनीसांना साडेपाच हजार रुपये देण्यात येतात. अलीकडेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ग्रामीण भागात आरोग्याचे काम करणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात सात हजार व सहा हजार दोशने रुपये वाढीची घोषणा केली. यामुळे आमच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता आम्हालाही आशां प्रमाणे मानधनवाढ मिळावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी लावून धरत चार डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले. अंगणवाडी सेविकांच्या या संपाचा मोठा फटका या अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार घेणाऱ्या ५८ लाख बालकांना बसत आहे. ही बालके पोषण आहारापासून वंचित असून महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार तसेच `टेक होम रेशनʼयोजना राबविण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी ते तोकडे असल्याचे महिला व बाल विकास विभागाचे अधिकारीच मान्य करतात.
