स्वस्त वाळू धोरण कुचकामी; वाळूचे दर गगनाला, बांधकामे प्रभावित…

 जिल्ह्यात सध्या वाळूला मोठी मागणी आहे. मात्र, वाळू घाटाची संख्या अत्यंत कमी असल्याने व लिलाव न झाल्यामुळे वाळू माफियाचे चांगलेच फावले आहे. दररोज रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक होत असून वाळूचे दर  गगणाला भिडले आहे. यामुळे बांधकाम व्यवसाय देखील प्रभावित होत असून सरकारचे स्वस्त वाळू धोरण जिल्ह्यात कुचकामी ठरत आहे.

सरकारने आखलेले नवीन वाळू धोरण जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याने वाळूचे दर वाशीमकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यात चोरट्या मार्गाने लोणी, लोणार मार्गे सेनगाव मार्गे, हिंगोली, पुसद कारंजा, शेलूबाजार, पातूर मार्गे वाळू वाहतूक होत आहे. जिल्ह्यात चोरीची वाळू ८ ते १०  हजार रुपये दराने विक्री केली जात आहे. वाळू वेळेवर मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक बांधकामे रखडली आहेत. परिणामी मजुरांच्या हाताला काम नाही. घरकुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहेत. अव्वाच्या सव्वा भावात वाळू ची विक्री होत आहे. मात्र स्थानिक प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप होत असून सोशल मीडियावर देखील प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.  रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांना शिस्तीचा बडगा दाखवून कारवाई होते तर जिल्ह्यात येणाऱ्या वाळूच्या गाड्यावर मात्र कारवाई होत नसल्याने रेती तस्करांना कुणाचे अभय आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *