तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले; तरुणाने पत्नीसह केली दोन मुलांची हत्या

घोडबंदर येथील कासारवडवली भागातील एका चाळीतील खोलीत एका तरुणाने पत्नी आणि दोन मुलांच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅट मारुन त्यांचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिस करीत आहेत.

भावना अमित बागडी (२४), खुशी अमित बागडी (६) आणि अंकुश अमित बागडी (८) अशी मृतांची नावे आहेत. तर, अमित धर्मवीर बागडी (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा हरीयाणा राज्यातील इसार जिल्ह्यातील खरडालीपुर गावचा रहिवाशी आहे. तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्याचा भाऊ विकास धर्मवीर बागडी हा कासारवडवली येथील शेंडोबा चौकातील सिद्धिविनायक निवास परिसरात गेल्या सात वर्षांपासून राहत आहे. अमित याला दारु पिण्याचे व्यसन जडले होते. या कारणास्तव त्याची पत्नी भावना हि त्याला सोडून गेली होती. ती दोन मुलांना घेऊन त्याचा भाऊ विकास याच्या घरी राहत होती. तीन दिवसांपुर्वी अमित हा भावना आणि दोन मुलांना भेटण्यासाठी विकासच्या घरी आला होता. गुरूवारी सकाळी विकास हा कामावर गेला. त्यावेळी अमित याने पत्नी भावना आणि दोन मुले खुशी व अंकूश यांच्या डोक्यात क्रीकेट बॅट मारून त्यांचा खून केला. दुपारी विकास घरी परतला तेव्हा त्याला या तिघांचे मृतदेह घरांमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अमितचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *