सदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले होते. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरील राडा प्रकरणात ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला असून शिंदे गटाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

स्मृतीस्थळावर झालेल्या गोंधळा प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता ठाकरे गट देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  ठाकरे गटाकडून  करण्यात आळी आहे.

सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप 

सदा सरवणकर यांनी माझी ओढणी खेचली. सदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला असा गंभीर आरोप रेणुका विचारे यांनी केला आहे. मी शिवाजी पार्क पोलिसांना तक्रार दिली आहे. मी तक्रार देवू नये म्हणून मला धमक्या आल्या. परंतु मी घाबरणार नाही.  शिवसेना एक कुटुंब आहे. पोलिसांनी वेळ मागितला आहे अशी प्रतिक्रिया  युवासेना पदाधिकारी गुरशीन कौर सहानी यांनी दिली आहे.

यापूर्वी देखील सरवणकर यांनी गोळीबार केला हा फॉरेन्सिक रिपोर्ट असताना कारवाई झाली नाही.  सरवणकर यांच्या मुलीनं धमकी दिली तरी कारवाई झाली नाही. ही तिसरी वेळ आहे. आताही पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीत.  उद्यापर्यंत वाट बघणार, नाहीतर आम्ही करायचं ते ठरवू. वारंवार अन्याय सहन करणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकारी विशाखा राऊत यांनी दिला आहे.

कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानं राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला

ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानं राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. खोटे गुन्हे दाखल केले जातायत ही गृहमंत्रालयाची विकृती आहे. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही…? दुसरं कोणीतरी राज्य करत आहे का हे पाहावे लागेल असा टोला राऊतांनी लगावलाय. तर, गृहमंत्रालय किती चांगलं काम करतं त्याचा अनुभव राऊतांना लवकरच येईल असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलंय.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी नेमकं काय घडलं होते?

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिन असतो.  बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 16 नोव्हेंबरला  स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करून गेल्यानंतर हा राडा झाला. ठाकरे आणि शिंदे गटातल्या शिवसैनिकांनी एकमेकांविरोधात भिडले आणि जोरदार घोषणाबाजी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *