आपल्या घरात लहान मुले असतील तर प्रत्येक मिनिटाला त्यांच्याकडे लक्ष ठेवणे किती गरजेचे असते, हे पालकांना चांगलेच माहिती आहे. कारण ‘नजर हटली आणि दुर्घटना घटली’ असे प्रकार घडत असतात.असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या उन्नावमधून समोर आला आहे. येथे 4 मुलांचा करंट लागून धक्कादायक मृत्यू झाला आहे. बारासागर क्षेत्रातील लालमन खेडे गावात ही घटना घडली. येथे घराबाहेर ठेवलेल्या पंख्यामध्ये विजेचा करंट पसरला. यानंतर एकामागोमाग एक चार मुलांना करंट लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घर आणि गावात एकच शोककळा पसरली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरु केली.
वाईट म्हणजे मृत पावलेली चारही मुले-मुली ही 9 वर्षाच्या आतील आणि एकाच परिवारातील होती.लालमन खेडे गावातील रहिवाशी विरेंद्र कुमार यांच्या घराबाहेर फर्राटा पंखा लावण्यात आला होता. जवळच खेळणाऱ्या मुलांनी या पंख्याला हात लावला आणि ते पंख्याच्या करंटमध्ये आले. यानंतर 3 मुलेही त्याच्या जवळ पोहोचली आणि त्यांनाही करंट लागला.
करंट लागल्याने चारही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयंक (8), हिमांशी (8), हिमांक (6) आणि मानसी (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले भाऊ-बहिण होती. या घटनेनंतर गावकरीदेखील हळहळले आहेत. बारासागर पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. यानंतर ठाणे अध्यक्ष दिलीप प्रजापति घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरु आहे.