ठाण्यात जलवाहिनी फुटल्याने काही भागांचा पाणी पुरवठा बंद; घरे-दुकानांतही पाणी शिरल्याने संताप

इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज (गुरूवार) पहाटे ४ वाजता ज्ञानेश्वर नगर नाका येथे फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी इंदिरानगरकडे येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, डवले नगर, रूपादेवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर, भटवाडी इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा आज (गुरूवारी) बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठा प्रवाह येथील नागरिकांच्या घरात व दुकानात आला. या घटनेने स्थानिकांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच समर्थ फाउंडेशनची टीम आणि शिवसेना शाखा संत ज्ञानेश्वर नगरमधील पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. संत ज्ञानेश्वर नगर नाक्यावरील मेन जलवाहिनी फुटल्याने या भागात समर्थ फाउंडेशनचे संस्थापक शहाजी खुस्पे आणि संत ज्ञानेश्वर नगर, डॉ. गंगाधर शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख विनायक सुर्वे यांनी मदतकार्य सुरु केले. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ पाणी बंद केले.

दरम्यान, या भागातील चाळींमध्ये झालेला चिखल काढण्यासाठी समर्थ फाउंडेशनची टीम काम करत असून स्थानिकांना जेवण व अल्पोपहार पुरवला जात असल्याची माहिती शहाजी खुस्पे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *