गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव वाढवणार, यंदा १९१ कृत्रिम तलाव

यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव वाढवण्यात आले आहेत. यंदा मुंबईत ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे. तसेच विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि फिरती विसर्जन स्थळेही तयार करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या तयारीची सर्वच स्तरावर लगबग सुरू आहे. दीड दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून विसर्जनाला सुरुवातही होईल. पालिका प्रशासनाने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्यावर्षी १६२ कृत्रिम तलाव तयार केले होते. यंदा तलावांची संख्या वाढवण्यात आली असून १९१ तलाव तयार करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी कृत्रिम तलावांमध्ये सुमारे ६६,१२७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. दरवर्षी कृत्रिम विसर्जन तलावाची संख्या वाढत असून त्यात विसर्जित होणाऱ्या मूर्तींची संख्याही वाढते आहे.

कृत्रिम विसर्जन तलावाबरोबरच काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे व फिरती विसर्जन स्थळेही असतील. विसर्जन स्थळापासून १ ते २ किमीच्या परिघात राहणाऱ्यांनी त्याचा वापर करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. विसर्जनापूर्वीची आरती, पूजा आदी विधी घरीच किंवा सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी पूर्ण करून गणरायाला निरोप द्यावा, ज्यामुळे विसर्जनस्थळी गर्दी कमी होईल असेही आवाहन पालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *