मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना अखेर यश

जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवलं आहे.

“राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आरक्षणात लक्ष्य घालून उपोषण सोडवण्यासाठी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. मला माझा समज प्रिय आहे. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. आरक्षण दिल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे.  धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. मराठा समाजासह अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आरक्षण घेणार आहे. मी तुम्हाला शब्द दिला आहे. तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सरकारच्या वतीने एक महिन्याच्या वेळ मागितल्याचा प्रस्ताव होता. तुम्ही दिलेल्या एक मताने मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय तीन दिवसांपूर्वी घेतला आहे. इथून पुढच्या काळातही मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या मतावर मी ठाम आहे. माझी राखरांगोळी झाली तरी मराठा समाजासोबत कधी गद्दारी करणार नाही,” असेही जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *