राज्याची चिंता वाढली! मलेरिया अन् डेंग्यूच्या तापासह या आजारानी वाढवलं टेन्शन

राज्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव इतर आजारांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये हे दिसून आले आहे.

१ जानेवारी ते २१ ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यामध्ये मलेरियाच्या ८,३८०, डेंग्यूच्या ४,९७२, तर चिकुनगुनियाच्या ४४४ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या सर्वाधिक नोंदण्यात आली. या कालावधीमध्ये राज्यात मलेरियाच्या २,०१९, डेंग्यूच्या १,८०८, तर चिकुनगुनियाच्या ८१ रुग्णांची नोंद झाली आहे.

 मलेरियाचे रुग्ण गडचिरोली, गोंदिया, रायगड येथे सर्वाधिक होते, तर सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर या जिल्ह्यांत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळले. चिकुनगुनियाची रुग्णसंख्या सिंधुदुर्ग, पुणे कोल्हापूर येथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक दिसून आली. मुंबईमध्ये १ जानेवारी ते २१ ऑगस्ट या कालावधीमध्ये मलेरियाच्या ३,२७२, ठाणे येथे २५६ रुग्णांची नोंद झाली. कल्याणमध्ये ७० जणांना मलेरियाची लागण झाली. डेंग्यूने मुंबईमध्ये सर्वाधिक ताप दिला. त्याखालोखाल नागपूर येथेही रुग्णसंख्या अधिक होती. मुंबईमध्ये १,८८९ जणांना, नागपूरमध्ये २४४ जणांना डेंग्यूची लागण झाली. चिकुनगुनियाच्या सर्वाधिक म्हणजे २१० रुग्णांची संख्या नाशिकमध्ये, मुंबईत ११० जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *