दिवावासी, आता रूळ ओलांडू नका! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या रेल्वे रूळ ओलांडण्याच्या सवयीमुळे गाड्यांना होणारा विलंब टाळण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. या भागातील पादचारी पुलावर चढण्यासाठी सरकत्या जिन्यांची उभारणी करून एका जिन्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्या जिन्याचे पुढील आठवड्यात लोकार्पण होणार असून अन्य दोन जिन्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांकडून पादचारी पुलांचा वापर वाढून फाटकावरील क्रॉसिंग पूर्णपणे बंद होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रेल्वे पुलांच्या पायऱ्या चढताना होणारी दमछाक टाळण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकात अनेक प्रवासी फाटक ओलांडण्यास प्राधान्य देत असल्याने या भागात महिन्याला सहा अपघात होत होते. या घटनांमुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा जीव जाण्याबरोबरच रेल्वे गाड्यांच्या वक्तशीरपणावरही परिणाम होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या भागातील पादचारी पुलांना सरकत्या जिन्यांची जोडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जागेची अडचण आणि सध्याचा रस्ता यामुळे सुरुवातीला या भागात सकरते जिने शक्य नव्हते. या भागातील रस्त्यावर ४२ मीटर आणि ६ मीटरचा डेक तयार करून त्यावर सरकता जिना तयार करण्यात आला आहे. नव्या डेकवर एटीव्हीएमसाठीही अतिरिक्त जागा देण्यात आल्यामुळे पादचारी पुलावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिमेकडील एस्कलेटरही पूर्णपणे तयार असून लवकरच चाचणीनंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले होईल. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई दिशेकडील प्लॅटफॉर्म १-२ वर आणखी एक एस्कलेटरची योजना आहे ज्यामुळे प्रवाशांची सोय आणखी वाढेल, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *