ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग: एमएमआरडीए नेमणार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) प्रकल्पाच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकत्याच निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या सल्लागारावर काम सुरु झाल्यापासून काम संपेपर्यंत कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. ठाणे-बोरिवली अंतर केवळ २०मिनिटात पार करता यावे यासाठी ११.८ किमी लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

या भुयारी मार्गात १०.२५ किमी लांबींच्या दोन बोगद्यांचा समावेश आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार केला आहे. याअनुषंगाने या प्रकल्पाचा खर्च११,२३५.४३ कोटी रुपयांवरून १६,६००.४० कोटी रुपयांवर गेला आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने निविदा अंतिम करण्यात आली आहे. निविदा अंतिम झाल्याने आता कामास सुरुवात होईल असे वाटत असतानाच वन विभाग आणि वन्यजीव विभागाच्या परवानगीसाठी काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे कामास विलंब होण्याची चिन्हे आहेत. तर  बोगद्याच्या कामासाठी लागणारी चार टीबीएम यंत्रे मुंबईत येण्यासाठीही वेळ लागणार आहे. एकूणच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास वेळ लागणार असतानाच एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठी नुकतीच निविदा जारी करण्यात आली आहे.  २५ सप्टेंबरपर्यंत इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *