अमलीपदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत टोळीला गुन्हे शाखेने मुलुंड परिसरातून अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून आरोपींकडून एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुलुंड टोल नाका परिसरात बुधवारी सापळा रचला. यावेळी दोन मोटारगाड्यांमधून आठजण तेथे आले.

पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.चेंबूर परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचा साठा लपवून ठेवण्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.  पोलिसांनी चेंबूरमधील एका घरातून ३५० ग्रॅम मेफेड्रोन, ४५ ग्रॅम चरस, तसेच मोटारगाड्या आणि काही मोबाइल असा एकूण १ कोटी २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून साहिल खान (२७),  अजमल शेख (४५), शमशउद्दीन शहा (२२), इम्रान पठाण (३७), तौसीबी मंसुरी (२७), इस्माईल सिद्धीकी (३६), सर्फराज खान (३५), रईस कुरेशी (२५) आणि सना खान (२५) या नऊ जणांना अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपी सराईत तस्कर असून त्यांच्याविरोधात विविध शहरात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *