ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी ते येत असताना सकाळी त्यांना हृदयविकाराच्या झटका बसला. यानंतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
हरी नरके यांच्याविषयी..
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राहिले आहेत.मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे.
हरी नरके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात विपुल अभ्यास करून त्यासाठी प्रदीर्घ लढाई दिली. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र विविध माध्यमातून समाजासमोर आणले. तसेच पुरोगामी विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध होते.
समता परिषदेच्या माध्यमातून हरी नरके यांनी ओबीसी वर्गासाठी काम केले होते. अतिशय सामान्य घरात जन्म झालेल्या हरी नरके यांनी सुरुवातीच्या काळात टेल्को कंपनीमध्ये नोकरी केली.
छगन भुजबळ यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात असत. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देणे तसेच विद्यापीठांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करणे यासाठी विशेष प्रयोग त्यांनी केला होता.
