249 कोटींचं कर्ज, एनडी स्टुडिओ जप्तीचा प्रस्ताव; म्हणूनच नितीन देसाई होते नैराश्यात!

चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडीओत (ND Studios)आत्महत्या केली. यानंतर चित्रपट सृष्टीला मोठा हादरा बसला आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (2 ऑगस्ट 2023 रोजी) पहाटे चार वाजता गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान देसाई यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असतानाच देसाई यांच्यावर मोठे कर्ज होते असे वृत्त समोर येत आहे.

नितीन देसाई यांनी180 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र त्या मुळ रकमेवरील व्याज वाढून कर्जाची रक्कम सुमारे 249 कोटी रुपयांवर पोहोचली होती अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावली होती. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली होती. नितीन देसाई यांच्याकडून कर्जाची वसुली होत नव्हती.

जप्तीचा प्रस्ताव नाकारला 

कलिना मुंबईस्थित असणाऱ्या एडलवाइस ॲसेट रिकंन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र या प्रस्तावावर जिल्हा प्रशानाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नव्हता असेही वृत्त समोर येत आहे. या सर्व घटनेतून नितीन देसाई यांना नैराश्य आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सर्वांशी चांगले संबंध

नितीन यांनी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितिन देसाई यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाचे कारण समोर आले नसून त्यात पोलिस तपास घेत आहेत. त्यावर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्थिक विवंचनेत

आज सकाळी चार वाजता त्यांच्या मेन हॉलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून स्टुडिओमध्ये काम चालत नव्हते. आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती कार्यकर्त सुधीर ठोमरे आणि प्रविण मोरे यांनी दिली आहे. पोलीस त्यांचा मृतदेह घेऊन गेले आहेत. आता त्यांच्या पार्थीवाचं पोस्टमार्टन होणार असून पुढची प्रक्रिया सुरु आहे.

‘प्रचंड धक्का बसला’

संगीतकार कौशल इनामदार माध्यमांशी बोलताना  म्हणाले की ‘प्रचंड धक्का बसला आहे. मला विश्वास बसलेला नाही कारण मला ज्यांनी फोन करून सांगितलं त्यांना मी दोनवेळा विचारलं. खरंतर गेल्या वर्षभरात माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. त्याच्याआधी आमचं दोन-तीनवेळा बोलणं झालं होतं. ते देखील कामानिमित्तानं. त्यांना मी गेल्याच वर्षी कर्जतला भेटायला गेलो होतो.’  बालगंधर्व सिनेमाच्या निमित्तानं कौशल इनामदारक हे नितीन देसाई यांच्या संपर्कात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *