प्रसिद्ध अभिनेत्याचा लोणावळ्याला जाताना अपघात, ट्रकने कारला दिली धडक; म्हणाला, “मी रात्रभर…”

‘भाग्यलक्ष्मी’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश चौधरीचा अपघात झाला आहे. शनिवारी तो लोणावळ्याला जात असताना ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. यावेळी त्याचा पाळीव श्वान त्याच्याबरोबर होता. या अपघातात सुदैवाने आकाश किंवा हेजल (पाळीव श्वान) कोणालाही दुखापत झाली नाही. आकाशने सीट बेल्ट घातल्याने तो बचावला, मात्र या अपघातामुळे तो हादरला आहे.

आकाश चौधरी म्हणाला, “ट्रकने धडक दिली तेव्हा मला काय घडलंय ते कळलंच नाही. आम्हाला दुखापत झाली नाही, परंतु या अपघाताने मला हादरवून सोडलंय, माझी झोप उडाली. मी सुट्टीवर होतो, पण मला रात्री झोप आली नाही. रस्त्यावर काय घडू शकलं असतं हा विचार करून मी रात्रभर घाबरत राहिलो. आयुष्य किती नाजूक आणि अस्थिर असू शकतं याची मला जाणीव झाली. आम्हाला सुरक्षित ठेवलं त्यासाठी मी देवाचा आभारी आहे.”

अपघातानंतर आकाश चौधरीने निष्काळजीपणाने ट्रक चालवणाऱ्या चालकाला समज दिली आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली. “वैभवी उपाध्याय आणि देवराज पटेल यांचा अचानक एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर मी रस्त्यावर गाडी चालवताना खूप घाबरलो होतो. पोलीस खूप सतर्क होते, त्यांनी येऊन ड्रायव्हरला अटक केली, पण तो गरीब माणूस असल्याने मी माझी तक्रार मागे घेतली,” असंही आकाश चौधरी म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *