मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे अनेक परिसरात पाणी साचलं. अशातच मुंबईत पावासने दोन बळी घेतले आहेत. गोवंडी परिसरात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचा नालेसफाईता दावा फोल ठरला आहे.
नाले सफाई करताना दुर्घटना
शनिवारी दुपार पासूनच मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. गोवंडी मधील शिवाजी नगर परिसरामध्ये नाल्यामध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. रामकृष्ण( वय 25 वर्षे) आणि सुधीर दास (वय 30 वर्षे) अशी मृतांची नावे आहे. दोघेही कंत्राटी सफाई कामगार असल्याचे समजते. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघेही गोवंडी परिसरात नालेसाफाईचे काम करत होते. यावेळी ते नाल्यात पडले. या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढले. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पहायला मिळाले. दादर, अंधेरी, माटुंग, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले होते. यामुळे वाहनचाकांची मोठी तारांबळ उडाली. मुंबईतल्या सायन किंग्ज सर्कलमध्ये पाणी तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागतेय. मोठ्या प्रतिक्षेनंतर मुंबईत पावसाचं आगमन झालंय. अद्याप पावसानं हवा तसा जोर धरलेला नाही. मात्र या पावसातही मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय.
एक्सप्रेस हायवेवर पाणी तुंबले
या पावसानं मुंबईतल्या नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल केलीय. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाणी तुंबल्यानं याठिकाणी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा वाहतुकीवरही परिणाम झालाय. मुंबईतल्या नालेसफाईचे दावे प्रशासनाकडून करण्यात आलेत मात्र हे दावे फोल ठरल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. किरकोळ पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबत असेल तर मोठा पाऊस झाल्यानंतर इथली स्थिती काय असेल? असा सवाल आता दहिसरमधले नागरीक करत आहेत.
