मालेगावातील उंट अखेर मायभूमीकडे रवाना; दहा जणांवर गुन्हा दाखल

मालेगावातील उंट अखेर मायभूमीकडे रवाना; दहा जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव शहरात गेल्या तेरा दिवसांपासून मुक्काम असलेल्या ५४ उंटांचा अखेर मायभूमीकडे रविवारी (दि. २१) परतीचा प्रवास सुरू झाला. लालफितीच्या कारभारात या उंटांची राजस्थानकडे होणारी रवानगी लांबली होती. याबाबतची सुनावणी आज (दि. २२) मालेगाव न्यायालयात होणार असून, तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी उंटांना मायभूमीकडे रवाना करण्यात आले. याबाबत ‘मटा’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, उर्वरित चार उंटांना आज (दि. २२) वाहनाद्वारे रवाना केले जाणार असून, यात एका पिलाचादेखील समावेश आहे.

तालुक्यात ८ मे रोजी पोलिसांनी एकूण ४३ उंट पकडले होते. यातील एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित ४२ उंटांना नीळगव्हाण येथील गोशाळेत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक येथील उंट गेल्या आठवड्यातच राजस्थानच्या दिशेने रवाना झाल्याने मालेगावातील उंट कधी मायदेशी परतणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.शनिवारी पुन्हा पंधरा उंट सापडल्याने खळबळ उडाली होती. अखेर रविवारी हे सर्व ५४ उंट मायभूमीकडे परतले. सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटिक यांनी उंटाची तपासणी केली. यावेळी गोशाळा संचालक सुभाष मालू उपस्थित होते. सायंकाळी उशिरा दोन रायकांसह ५४ उंट रवाना झाले. उर्वरित चार उंट आज (दि. २२) रवाना होणार आहेत. नाशिक येथील उंट वणी येथे थांबले असून, त्यांच्यासोबतच मालेगावातील उंटाचा प्रवास होणार आहे. त्यामुळे उंटाची परवड अखेर थांबून त्यांचा मायभूमीच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याने प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *