शेवटची उडी मारुन घरी जाऊ असं म्हणाला, पण ओंकार पुन्हा परतलाच नाही; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

 सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार धर्मेंद्र लोहार (वय १७) असं त्या तरुणाचं नाव आहे. काल सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सारा गाव बंधाऱ्यावर धावला. मात्र, दुर्दैवाने ओंकारला वाचवू शकले नाहीत. त्याच्या मृत्यूने अनेकांना चटका लावला. तर घटनास्थळी लोहार कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेनं तारळीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसापर, ओंकार हा नेहमीप्रमाणे मित्रांसह धनगरवाडी जवळील बंधाऱ्यावर दुपारी चारच्या दरम्यान पोहायला गेला होता. “शेवटची उडी मारून घरी जाऊया”, असं म्हणत त्याने जी उडी मारली तो वर आलाच नाही. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाईकांना कल्पना दिली. गावात बातमी कळताच शेकडो लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तरुणांनी पाण्यात उड्या मारत ओंकारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका दरवाजाजवळ त्याचा मृतदेह हाताला लागत होता. पण त्याचे दोन्ही पाय लोखंडी प्लेटमध्ये अडकले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या प्लेटा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. दोराच्या साहाय्याने प्लेटा काढल्यावरच मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी बंधाऱ्यावर शेकडो युवक मदतीसाठी एकवटले होते. तब्बल तीन तासांनी मृतदेह हाताला लागला. उत्तरीय तपासणीनंतर मध्यरात्री शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकारला पोहण्याची आवड होती. तो तासनतास पोहायचा. पट्टीचा पोहणारा म्हणूनच त्याची परिसरात ओळख होती. नुकताच तो इयत्ता बारावीला गेला होता.

बंधाऱ्यात पाणी साठवण्यासाठी लोखंडी प्लेट लावून पाणी अडविण्यात येते. मात्र, दोन प्लेटमध्ये गॅप राहत होता. यामुळे पाण्याची गळती देखील होत होती. याकडे अनेकदा लक्ष वेधले होते. या प्लेट तंतोतंत बसविणे गरजेचे आहे. याच गॅपने तरुणाचा बळी घेतला. ओंकारचा पाय त्या गॅपमध्येच अडकल्याने पट्टीचा पोहणारा असूनही त्याला वर येता आले नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या चुकीच्या कामामुळे बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *