शिर्डीत साईंच्या तिजोरीत नोटांचा ओघ पुन्हा वाढणार? २००० हजारांची नोट बंद झाल्याने काय होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपये मूल्याची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे कोठे काय परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मागील वेळी अचानक केलेल्या नोटा भाविकांना शिर्डीच्या साईबाबा मदिंरातील दानपेटीत टाकल्या होत्या. त्यामुळे संस्थानची डोकेदुखी वाढली होती. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा अवधी असल्याने असे प्रकार होण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या बंद झालेल्या नोटा दानपेटीत टाकण्यात आल्या होत्या. सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या या नोटा आल्या होत्या.शिर्डीत येणारे भाविक दानपेटीत पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तूही टाकतात. पूर्वी नोटाबंदीचा निर्णय अचानक घेण्यात आला होता. त्यामुळे बदलून मिळण्याची शक्यता वाटत नसलेल्या, किंवा तो त्रास नको असलेल्या भाविकांनी या नोटा दान पेटीत टाकल्या होत्या. संस्थानकडून नियमितपणे बँकेत भरणा केला जात असल्याने मुदत आलेल्या नोटा बँकेत भरल्या गेल्या होत्या. सर्व मुदत संपल्यानंतरही सुमारे ७१ लाख रुपयांच्या नोटा संस्थानकडे आल्या होत्या.या अनुभवावरून आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर काय होईल, याची उत्सुकता आहे. मात्र, मागील वेळी झाला एवढा त्रास आणि गोंधळ यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. नोटा बदलून घेण्यासाठी पुरेशी मुदत आहे. त्यामुळे लोक नोटा बदलून घेऊ शकतील. शिवाय या नोटा दानपेटीत टाकल्या गेल्याच, तरीही फारसा त्रास होणार नाही. साईबाबा संस्थानकडे आलेल्या दानाची मोजदाद दर मंगळवारी आणि शुक्रवारी केली जाते. ही रक्कम लगेच बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आल्याच तर त्या लगेलच बँकेत जाणार आहेत. मुळात नोटांची मोजदाद करणाऱ्यांना असे आढळून आले आहे की, गेल्या काही काळापासून दानपेटीत दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण खूपच घटले आहे. मात्र, पूर्वीच्या नोटबंदीनंतर जुन्या नोटा दानपेटीत येण्याचे प्रमाण वाढले होते. तसे दोन हजाराच्या नोटांचेही वाढू शकते, असा अंदाज आहे. मात्र ते वाढले तरीही फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *