कल्याणमध्ये नोकराने जवाहिऱ्याचे ४५ लाख रुपये पळविले

कल्याण व्यवसायातील ४५ लाख लाख रुपयांची रक्कम मालकाने आपल्या विश्वासू नोकराला बँकेत भरण्यासाठी दिली. विश्वासू नोकराने मालकाचा घात करुन ती रक्कम बँकेत भरणा न करता आपल्या राजस्थान मधील मूळ गावी पळून गेला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच, पोलिसांचे एक पथक राजस्थान येथे नोकराच्या अटकेसाठी रवाना झाले आहे.

नरेश केवलचंद शंकलेशा (५१) हे कल्याण पश्चिमेतील काळा तलाव शेजारील संकुलात राहतात. त्यांच्याकडे रमेश झुंजाराम देवासी (२८, रा. बाला, ता. आहोरा, ता . जालोर, राजस्थान) हा अनेक वर्ष नोकर म्हणून काम करतो. घर, दुकान, बँकेतील व्यवहार तो पाहतो. दुकान मालक नरेश यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी व्यवसायातून जमा झालेली ४५ लाख रुपयांची रक्कम रमेश देवासी यांना बँकेत भरणा करण्यास सांगितली होती. नरेश यांच्या भावाचा मुलगा हर्षित याने विश्वासाने दिलेली रक्कम आपण कार्यालयात घेऊन जातो आणि तेथून बँकेत जातो, असे सांगून रमेशने पैशांची पिशवी घेऊन नरेश यांच्या घराबाहेर पडला. एवढी मोठी रक्कम मिळाल्याने आपणास नोकरीची गरज नाही असा कपटी विचार करुन रमेशने कार्यालयात न जाता राजस्थानमधील आपल्या मूळ गावी पळ काढला.

मालक नरेश कार्यालयात पोहचले तरी रमेशचा तेथे पत्ता नव्हता. बँकेत शोधाशोध केली तरी तो आढळून आला नाही. घर, दुकान परिसरात, बाजारपेठेत रमेश आढळून न आल्याने त्याने पैशाची पिशवी घेऊन पळ काढल्याचा अंदाज मालकाने काढला. त्यांनी तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक व्होनमाने यांनी तातडीने विशेष तपास पथक तयार केले. ते रमेशच्या मूळ गावी पाठविले. राजस्थानकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांवर पोलिसांनी पाळत ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *