सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा  आजचा पाचवा दिवस असून मागणी पूर्ण होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे. संपामुळं सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत.  जुनी पेन्शन योजना  पुन्हा सुरु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या शिफारशीनंतर झालेला निर्णय दरम्यानच्या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू करू, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सरकारकडून ठोस काहीही सांगण्यात येत नसल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच सरकारने मेस्माचा धाक दाखविल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला

दरम्यान, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. मुंबईत रुग्णालयातील ओपीडी रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. जे.जे. मध्ये शुक्रवारी फक्त 16 शस्त्रक्रिया तर, तर जी.टी आणि सेंट जॉर्जेसमधील बहुतांश शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.

 जे. जे. रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागात  दररोज चार हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र शुक्रवारी 1800 रुग्णच उपचारासाठी आले. जी.टी. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे एक हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात, मात्र शुक्रवारी 450 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आले होते, तर अपघात विभागामध्ये 76 रुग्णांवर उपचार करण्यात आले. सेंट जॉर्जेस रुग्णालयातही शुक्रवारी बाह्यरुग्ण विभागात 127 रुग्ण आले होते.

आता यांच्यावर रुग्णसेवेचा भार

संपामुळे ठप्प झालेली रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी रुग्णालयांमध्ये तातडीने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर संपाच्या चौथ्या दिवशी आरोग्य विभागात कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी काम खोळंबले आहे. त्यामुळे कक्ष सेवक, शिपाई, सफाई कामगार यांची कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करुन घेण्यात येणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *