उत्तर महाराष्ट्रात १९ हजार हेक्टरचे मातेरे; २८ हजार १०४ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत थैमान घातले असून, त्याचा २८ हजार १०४ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पाचही जिल्ह्यांत १९ हजार ३५९ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे मातेरे झाले आहे. सलग दोन हंगामात अस्मानी संकटाचा घाव सहन करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर या पाचही जिल्ह्यांत ४ ते ८ मार्च या कालावधीत कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली, हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली. या संकटाचा फटका विभागात सर्वात जास्त जळगाव जिल्ह्याला, तर त्याखालोखाल धुळे जिल्ह्याला बसला. जळगाव जिल्ह्यातील १३ हजार ३५४ शेतकऱ्यांच्या ८ हजार ९६६ हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली. धुळे जिल्ह्यातही ४ हजार ५३७ शेतकऱ्यांच्या ४२९१.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मातेरे झाले. नाशिक जिल्ह्यातही २ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या २६८५.३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नंदुरबार जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात अवकाळीने थैमान घालून २ हजार ८१५ शेतकऱ्यांची १५७५.८० हेक्टर क्षेत्रावरील रब्बीची पिके आडवी केली. नगर जिल्ह्यात १८४१ हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाल्याचा फटका ४ हजार ६०० इतक्या शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची आस लागली आहे.

वकाळी पावसामुळे झालेले नुकसान (क्षेत्र हेक्टर)

जिल्हा—बाधित शेतकरी—पिकांचे क्षेत्र—प्राण्यांची हानी—घरांचे नुकसान

नाशिक—२,७९८—२,६८५.३५—६—५

धुळे—४,५३७—४,२९१.२०—८—३

नंदुरबार—२,८१५—१,५७५.८०—४—१९

जळगाव—१३,३५४—८,९६६.०३—२—०

नगर—४,६००—१,८४१—०—०

एकूण—२८,१०४—१९,३५९.३८—२०—२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *