शांती उपवनच्या रहिवाशांना दिलासा! येत्या अडीच वर्षात मिळणार हक्काची घरे

इमारत खचल्याने भिंतीला भेगा पडताच इमारतीबाहेर पडून बेघर झालेल्या २४० जणांना त्यांच्याच जागेत अडीच वर्षांत हक्काची घरे देण्याचे आश्वासन विकासक लोढा यांनी दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी दिली. या बेघरांच्या घरांच्या प्रश्नासाठी शिंदे यांनी पालिका मुख्यालयातील आयुक्ताच्या दालनात विकासकांसह बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरातील शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका इमारतीच्या स्लॅबसह भिंतीला तडे जात इमारत खचू लागली होती. यानंतर इमारतीमधील रहिवासी घराबाहेर पडले. जवळपास २४० कुटुंबे रात्रभर इमारतीबाहेरील रस्त्यावर थांबली होती. दुसऱ्या दिवशी या रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र विकासकाकडून हक्काच्या घराचे आश्वासन मिळत नाही तोपर्यत जागेवरून न हटण्याची भूमिका रहिवाशांनी घेतली होती.

घरभाडे भरण्यासाठीही पैसे नसताना आणि पूर्ण संसार या इमारतीत अडकलेला असताना आम्ही जाणार तरी कोठे, असे रहिवाशाचे म्हणणे होते. यानंतर या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पोलिस आणि स्थानिक नेत्यांकडून देण्यात आले होते. यानंतर खचलेल्या दोन इमारती वगळता इतर इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित बंदोबस्तात बाहेर काढण्याची परवनागी देण्यात आली होती. आजही दोन इमारतीत रहिवाशाचा संसार अडकून पडला आहे. हा गंभीर प्रश्न खासदार शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासमोर बुधवारी मांडला. यावेळी या इमारतीच्या विकासकाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. या रहिवाशांची ही हक्काची घरे असून मागील २० वर्षांहून अधिक काळ ते या इमारतीत राहत आहेत. त्यामुळे त्यांना त्याच जागी हक्काची घरे मिळावीत यासाठी येत्या अडीच वर्षांच्या काळात तेथे नव्याने इमारती बांधून नागरिकांना हक्काची घरे दिली जावीत, याशिवाय या कालावधीसाठी त्यांना घरभाडे दिले जावे, असे आदेश विकासक लोढा यांना देण्यात आले. रहिवाशांनीही यास मान्यता दिल्याने लवकरच या ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *