करण्याच्या नावाखाली निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची ऑनलाइन फसवणूक; कल्याणमधील घटना

सायबर गुन्हेगारांनी एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची बँकेत केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक केली असून त्यांच्या बँक खात्यामधून सव्वा लाखांपेक्षा अधिक रक्कम काढण्यात आली आहे. गुन्हेगार एवढ्यावरच थांबले नाहीत. मुदत ठेवीच्या खात्यामधूनही पाच लाखांचे कर्ज काढत गुन्हेगारांनी त्यांना सहा लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कल्याणमधील वाडेघर येथील ७२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक निवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. मुलाचे उत्पन्न आणि त्यांना मिळणाऱ्या निवृत्तवेतनावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे. २ फेब्रुवारीला त्यांना संदीप कुमार याचा फोन आला. त्याने आपण बँकेतून बोलत असून तुम्ही बँकेत केवायसी अपडेट केले नाही. केवायसी अपडेट करण्याची मुदत १० जानेवारीपर्यंत होती. तुमचे बँक खाते बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. खाते बंद होईल, या भीतीने या त्यांनी केवायसीसाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केल्यानंतर संदीप कुमार याने त्यांच्याकडून बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा सोळा अंकी नंबर आदी माहिती घेतली. नंतर आलेला ओटीपी नंबरही त्यांनी सांगितला. ज्येष्ठ नागरिकाने ही बाब मुलाला सांगितल्यानंतर मुलाने या प्रकाराविषयी संशय आला. त्याने वडिलांना तत्काळ ऑनलाइनद्वारे बँक खात्यामधील शिल्लक रक्कम तपासण्याविषयी सांगितले. त्यांनी खात्यामधील शिल्लक रक्कम तपासली असता, रक्कम बरोबर होती. थोड्या वेळाने बँक खात्यामधून एकूण १ लाख ३९ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. नंतर आणखीन एक लाख रुपये काढल्याचा मेसेज आला. मात्र, एक लाख रुपये ज्या खात्यामधून काढले, त्या खात्याचा नंबर वेगळा होता. हे खाते त्यांचे नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांनी कल्याणमधील बँकेच्या शाखेमध्ये धाव घेत या संपूर्ण प्रकाराविषयी चौकशी केल्यानंतर त्यांच्या मुदत ठेव खात्यामधून ऑनलाइनद्वारे पाच लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचे समजले. गंभीर बाब म्हणजे त्यांनी हे कर्ज काढलेले नाही. अशा प्रकारे एकूण ६ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.वीज बिलाविषयी ग्राहकांना खोटा मेसेज पाठवून फसवणूक करण्याचे सत्र अद्याप चालू आहे. कल्याण येथील एका व्यक्तीला भामट्यांनी वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा बंद करण्यात येईल असा मेसेज पाठवला. नंतर त्यांना काही अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. या अॅपद्वारे त्यांनी ऑनलाइन ३०० रुपये भरले असता, त्यांच्या बँक खात्यामधून ९९ हजार ५०० रुपये काढण्यात आले. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *