सिद्धीविनायक मंदिरातील 9 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, राज ठाकरेंच्या आरोपांनंतर सदा सरवणकर यांचं स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांनंतर सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टची पत्रकार परिषद पार पडली. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी यावेळी भूमिका मांडली. यावेळी सदा सरवणकर यांनी सिद्धीविनायक मंदिरात काही अनियमित प्रकार झाल्याचं मान्य केलं. या प्रकरणी मंदिर ट्रस्टच्या जवळपास अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं. तसेच मंदिराच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचं सदा सरवणकर यांनी सांगितलं.

“महायुतीच्या काळात सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली. त्यानंतर मंदिरातील जी काही अनियमितता आहे त्यावर बंधनं यावीत यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाने काम करत असताना लक्षात आलं की, कर्मचाऱ्यांमध्ये काही कंत्राटी तर पर्मनंट कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांकडून दर्शन देण्यासाठी काही पैसे घेतले जातात. ते ऑनलाईन घेतले जातात, असं लक्षात आलं”, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं.

‘कर्मचाऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतले’

“त्यावेळेला मी काही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना काही दिवस सस्पेंड केलं. त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतलं की, यापुढे असं कृत्य आमच्याकडून होणार नाही. यानंतर लक्षात आलं की, बाहेरचे काही स्टॉलवाले आणि एजंट मंडळी हे परस्पर लोकांना दर्शन देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार व्हायचा. हा व्यवहार आम्ही तातडीने बंद केला”, अशी माहिती त्यांनी दिली.

‘9 कर्मचारी पकडले, त्यांच्यावर कारवाई केली’

“यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचालाखी करुन पैसे काढतात हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं आणि कारवाई करण्याची विनंती केली. त्यावेळेला 9 कर्मचारी पकडले गेले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे उत्पन्न जे कमी होतं ते वाढलं”, असा दावा सदा सरवणकर यांनी केला.

भटजींना बैठक घेऊन पैसे दानपेटीत टाकायला सांगितलं’

“भक्त येतो तेव्हा पेटीत काही पैसे दान करत आणि भटजींना काही देतो. पण नियमाप्रमाणे भटजींना कोणी पैसे दिले तर दानपेटीत टाकावेत, असा नियम आहे. पण त्या नियमाकडे दुर्लक्ष केले जात होते. आम्ही कटाक्षाने भटजींसोबत बैठका घेऊन सांगितलं की, आपल्याला जे पैसे दिले जातील ते देखील दानपेटीत टाका. ते टाकल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीची वाढ होत असल्याचं लक्षात आलं”, असं सदा सरवणकर म्हणाले.

‘उत्पन्नात डबलचा फरक’

“ही वाढ आणखी कशी करता येईल किंवा यापूर्वीदेखील ही वाढ होऊ शकली असती हे ऑडिटमध्ये कसं दाखवता येईल, यासाठी आमचे ट्रस्टी लक्ष देत आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे. दोन वर्षापूर्वी 40 ते 45 लाख जमा व्हायचे. आता ती रक्कम 90 ते 98 लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे आताच्या आणि आधीच्या उत्पन्नात फरक का होता ते शोधावं यासाठी पत्र लिहिलं आहे”, असं सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *