आई-बाबांना मदत करण्यास शेतात गेली, १७ वर्षीय युवतीला सर्पदंश, तडफडून प्राण सोडले

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. राजापूर येथील एका १७ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रगती हनुमान वाघ असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या १७ वर्षीय दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या घटनेने वाघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर येथे राहणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी प्रगती वाघ सुट्टी असल्याने आपल्या आई-वडिलांबरोबर शेतात काम करत होती. यावेळी तिला शेतात सर्पदंश झाला.

ही बाब लक्षात येताच तिने त्याच परिस्थितीत राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली, मात्र त्या वेळेस ती बेशुद्ध झाली. यावेळी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकाच वेळेवर हजर नसल्याने तिला खाजगी वाहनाने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार करण्यात येत असताना उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काल पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.

आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि ॲम्बुलन्स उपलब्ध झाली असती तर या मुलीचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

ॲम्बुलन्स उपलब्धच होत नाही. त्यामुळे या ॲम्बुलन्स चालकाला कार्यमुक्त करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गैरहजर असलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. लाखो रुपये खर्चूनही आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *