मित्रांसोबत गेलेल्या मुलाची बॉडी रुळांजवळ सापडली, सहा वर्ष कुटुंबाला छळणारं गूढ अखेर उकललं

सहा वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील एक तरुण २०१७ च्या जानेवारी महिन्यात बेपत्ता झाला होता. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी मयत तरुणाच्या दोघा मित्रांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे. रविवारी एका पोलीस अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली. तरुणाचा घात करणारे त्याचेच मित्र निघाल्यामुळे कुटुंबीयांच्या पायाखालील जमीन सरकली आहे.

तुला कॅटरिंगचा जॉब देतो, असं आमिष दोघा आरोपींनी तरुणाला दाखवलं होतं. ११ जानेवारी २०१७ रोजी ते ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय परझेज उर्फ परवेश चौहान याच्या घरी पोहोचले. त्यानंतर ते त्याला आपल्या सोबत घेऊन गेले, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

दोघे आरोपी परझेज याला सोबत तर घेऊन गेले, पण परत आले नाहीत, असा उल्लेख तो बेपत्ता झाल्यानंतर दाखल असलेल्या पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. जेव्हा चौहान कुटुंबीयांनी त्याच्या दोघा मित्रांकडे (आरोपी) परझेजची चौकशी केली, तेव्हा त्या दोघांनीही उडवा उडवीची उत्तरं दिल्याचा आरोप आहे.

काही दिवसांनंतर, डोंबिवली पोलिसांनी परझेजच्या कुटुंबाला फोन केला. परझेजचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली. हे अपघाती मृत्यूचे प्रकरण आहे, असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून चौहान कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

चौहान कुटुंबाला यात काहीतरी संशयास्पद घडत असल्याचा संशय आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कळवा पोलिसांनी शनिवारी दोन आरोपींच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२ (हत्या) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *