सांगलीतील जत तालुक्यातील अमृतवाडी येथील दोन लहान मुले बेपत्ता असून त्यांचा घराजवळ विहीरीत शोध घेण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. दोन्ही मुले बहिण भाऊ असून काल दुपारपासून गायब आहेत. अमृतवाडी येथील टकलू उर्फ तेजस्विनी आनंदा गवळी (वय ५ ) आणि दाद्या उर्फ इंद्रजित आनंदा गवळी (वय ३ ) ही दोघे काल घराजवळ खेळत होती. रात्र झाली तरी मुले घरात आली नाहीत, म्हणून पालकांनी शोधाशोध केला. मात्र, कुठेच ही बहिण भावाची जोडी आढळली नाही. यामुळे गुरूवारी रात्री जत पोलीस ठाण्यात दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
आज सकाळपासून मुलांचा शोध सुरू करण्यात आला. घराजवळ ६० फूट व्यासाची विहीर आहे. खेळताखेळता ही मुले विहीरीत पडली असल्याची शक्यता गृहित धरून विहीरीत शोध घेण्यात येत आहे. सकाळपासून विहीरीतील पाणी उपसा वीज पंपाच्या मदतीने करण्यात येत होता. मात्र, दुपारी वीज भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज पंप बंद पडला. यानंतर जनरेटर आणून विहीरीतील पाणी उपसा करण्यात येत आहे. जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. रामागरे हे घटनास्थळी असून अन्य शययता लक्षात घेउनही मुलांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
