महापालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल, रुग्णालये, शैक्षणिक, व्यावसायिक, सार्वजनिक, औद्योगिक आणि १५ मीटरपेक्षा उंच रहिवासी इमारतींना फायर ऑडिट करण्यासाठी आता महापालिकेने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. सर्व इमारत मालक व भोगवटाधारकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत फायर ऑडिट करून त्याप्रमाणे उपाययोजनांचा दाखला अग्निशमन विभागाकडे सादर केला नाही तर या इमारतींचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित करून पोलिसांमार्फत इमारत सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, वर्षातून दोनदा फायर ऑडिट करणे बंधनकारक असतानाही अग्निशमन विभाग मात्र निव्वळ नोटिसांचा फार्स करीत असल्याचे चित्र आहे.
शासकीय कार्यालये व उंच इमारतींमध्ये आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने ६ डिसेंबर २००८ पासून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ लागू केला आहे. या अधिनियमातील कलम ३(३) नुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांसह १५ मीटर उंचीच्या सर्व इमारतींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. संबंधित भोगवटा धारकांना वर्षातून दोन वेळा म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याकडे फायर ऑडिट सादर करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भातील सूचना महापालिकेने वेळोवेळी देऊनही बहुतांश इमारतींचे मालक, भोगवटादार फायर ऑडिट करीत नसल्याचे चित्र आहे. परंपरेप्रमाणे यंदाही फायर ऑडिट करून परवानाधारक एजन्सीकडून फायर ऑडिटचे प्रमाणपत्र महापालिकेकडे सादर करण्यासाठी अग्निशमन विभागाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीनंतरही फायर ऑडिटची पूर्तता न करणाऱ्या इमारतींचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित केला जाणार असून, पोलिसांमार्फत संबंधित इमारत सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईही प्रस्तावित केली जाणार आहे.
कायदा काय सांगतो?
जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागलेली आग असो वा शहरातील फर्निचर मॉलमध्ये भडकलेली आग असो, या घटनांपासून आता तरी बोध घेतला पाहिजे. रुग्णालयांसारख्या संवेदनशील वास्तूही अग्निशमन विभागाच्या नोटिसांची वाट पाहतात, हे धक्कादायकच म्हणावे लागेल. दरवर्षी फायर ऑडिटच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र, पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही हे वास्तव नववर्षात बदलायला हवे. त्यामुळे फायर ऑडिटबाबत केवळ तंबी देऊन न थांबता, गंभीरपणे कडक पावलेही उचलायला हवीत. तरच नोटिसांचा परिणाम साधता येईल. चालढकलपणा अनेकांच्या जिवावर बेतू शकतो, याचे भान ठेवून वेळीच खबरदारी घेऊन फायर ऑडिट करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.
