मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश!

नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे या भागात ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला आहे. सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील आज (१३ जानेवारी) झालेल्या या अपघातात एकूण १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे भीषण स्वरुप पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.

साई दर्शनासाठी जात होते प्रवासी

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथील सद्गुरू पॅकेजिंग कंपनीतर्फे कामगार आणि कुटुंबियांना एकूण १५ बसमधून दर्शनासाठी शिर्डी येथे नेले जात होते. त्यातील पाचव्या क्रमांकाच्या बसला अपघात झाला. कल्याण येथील गाईड ट्रॅव्हल कंपनीची ही बस आहे. बस सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ईशान्येश्वर मंदिराच्या कमानीजवळ आली असता ट्रकशी समोरासमोर धडक होऊन बस उलटली. अपघात इतका भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णत: कापली गेली. यामध्ये १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३४ हून अधिक प्रवासी जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांसह वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

मृतांची ओळख पटण्यास विलंब

शिर्डीकडे मार्गस्थ होताना रस्त्यात हॉटेलमध्ये थांबलेल्या काही प्रवाशांनी बसमध्ये अदलाबदल केली होती. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास विलंब लागत आहे. सकाळपर्यंत मृतांमधील सहा जणांची ओळख पटली असून ते उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.

अपघातातील जखमी प्रवासी

निधी उबाळे (९), माया जाधव (३५), प्रशांत मेहती (३५), सिमा लोले (४०), सपना डांगे (२८), हर्षद वाडेकर (१४), धनिशा वाडेकर (सहा), श्रविण्या वारकर (पाच), आशा जयस्वाल (४३), जिगर कहर (१३), बबलीदेवी कहर (३३), योगिता वाडेकर, रंजना कोठले (४०), सुप्रिया बाहीहीत, क्षुणिका गोंधळे (४२), वर्षाराणी बेहेरा (३१) हे जखमी झाल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली. त्यातील तीन जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

दरम्यान, या भीषण अपघातात एकूण १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात खासगी बसमध्ये ३५ ते ४५ प्रवासी असल्याची प्रवास करत होते. यातील पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खासगी तसेच शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *