भीषण अपघातात मोडक महाराज यांचे निधन

भीषण अपघातात मोडक महाराज यांचे निधन

मुंबई, रत्नागिरी, अलिबाग सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री. स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्या संख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद (मोडक महाराज) यांचे पुणे बंगळूरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात निधन झाले. श्री. नवनित्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक (वय ५४) रा. कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री. स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष होते.

पुणे बंगळूरू महामार्गावर साताऱ्यातील सातारा शहरातील अजिंठा चौक परिसरात कार दुभाजकावर आदळून हा अपघाता झाला. यामध्ये कारच्या समोरील काच फुटून मोडक महाराज हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. कल्याण येथील स्वामी समर्थ मठातील अरुण मोडक हे कारने कल्याणहून कोल्हापूरकडे जात होते. यावेळी गणेश जगदीश नरडूक हे गाडी चालवत होते. पहाटेच्या सुमारास ते अजंठा चौक परिसरात आले. यावेळी चालक नरडूक यांना डुलकी आल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. अचानक धडक बसल्याने शेजारी बसलेले अरुण मोडक हे समोरच्या काचेतून बाहेर फेकले गेले. महामार्गावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मोडक महाराज यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच राज्यभरातील भक्तगण कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कल्याण जिल्ह्यात मोडक महाराज यांनी श्री. स्वामी समर्थ मठांची स्थापना केली होती. त्यांचे राज्यभरात अनुयायी सुद्धा आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *