आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार दिसून येत आहेत. काही ठिकाणी साधूंना बोलावून वेगवेगळ्या पूजाअर्चा केला जात असल्याचं उघडकीस आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. यातूनच बामणी गावांमध्ये एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू आल्याने चर्चांणा उधाण आले आहे.
साधूंचा पाठलाग करत पिटाळून लावलं
हा प्रकार समजताच गावातील तरुणांनी या साधूंचा पाठलाग करत त्यांना गावातून पिटाळून लावलं. सुरुवातीला गावातील उमेदवाराचा पत्ता विचारणारे साधू नंतर मात्र आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे कारण सांगितले. पण तरुणांनी रामेश्वर यात्रा गावात नसताना गावात काय काम असा जाब विचारात या साधूंवर प्रश्नाचा भडीमार केला. हे साधू कसे बसे ग्रामस्थांच्या तावडीतून सुटले. पण हे साधू नेमकं कोणत्या उमेदवाराकडे आले होते, तो उमेदवार साधूंना बोलावून काय करणार होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.
निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातल्या मुदत संपलेल्या 7751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान असेल. ग्रामपंचायतींसाठी 20 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमधील निवडणूक जाहीर झाली. यावेळी शासनाकडून मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. खाजगी आस्थापनांनी सुट्टी शक्य नसल्यास किमान २ तासांची सवलत देण्याचे आदेश देण्यात आलेत.. अशी सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.
कोल्हापुरात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर
शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला आहे. परडीत मुलींचा फोटो ठेऊन त्यावर हळद कुंकू, लिंबूला टोचलेल्या टाचण्या, हिरवं कापड असा उतारा ठेवल्याचा धक्कादायक घडला. बालिंगा-पाडळी रस्त्यावर हा जादूटोण्याचा प्रकार उजेडात आलाय. हा अघोरी प्रकार कुणी केला ? याचा तपास आता पोलीस करतायत. पण, वशीकरणासाठी करण्यात आलेल्या या काळ्या जादूच्या घटनेमुळे आता पाडळी खुर्द या गावातील मुलींना घराबाहेर पडता येत नाही. त्यांची शाळा बंद होतेय की काय अशी परिस्थिती आहे.
वाळूजमधल्या मृतदेहाचं गूढ उकललंय
तर तिकडे संभाजीनगरच्या वाळूजमधल्या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. मिठात पुरलेला मृतदेह हा आरोपीच्या पत्नीचा असल्याचं तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी काकासाहेब भुईगळला अटक केलीय. बंद असलेल्या घरात किचनमध्ये मिठात पुरलेला मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती.
पत्नी लग्नानंतर सतत आजारी असायची, तीचा घरातच मृत्यू झाला. पण अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तीला घरातच पुरलं असा जबाब आरोपी काकासाहेब आणि मृत महिलेच्या आईने दिलाय. पण महिलेचा मृत्यू नैसर्गिक झाला की यामागे काही घातपात आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
