कोरोनाच्या वेगाच्या पाचपटीने राज्यात गोवरचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गोवर नियंत्रणात आणण्यासाठी आता लस मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच गोवरचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आलेत.
आतापर्यंत 428 बालकं गोवरबाधित
गोवरचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी मुलांना मास्क बंधनकारक करा, असं मत राज्याच्या गोवर प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. गोवरबाधितांच्या थुंकीतून हा आजार पसरण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे लहान मुलांचं गोवरच्या संसर्गापासू न संरक्षण करण्यासाठी मास्कची मदत होईल, असे मत साळुंखेंनी व्यक्त केले आहे. राज्यात गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 428 बालकं गोवरबाधित आढळली असून 12 बालकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रावर नवीन संकट ओढवलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरचा सगळ्यात मोठ्या धोका हा लहान मुलांना आहे. अशात गोवरशी लढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. गोवरवर मात करण्यासाठी लसीकरण करण्याचे ठरविले आहे.
राज्य कृतिदलाकडून गोवरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यामध्ये दोन टप्प्यांममध्ये लसीकरण होणार आहे. या मोहीमतर्गंत नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एकही लशीची मात्रा न घेतलेल्या बालकांवर लक्षकेंद्रीत करण्यात येणार आहे. पहिला टप्प्या 15 ते 30 डिसेंबर तर दुसरा टप्पा हा 15 ते 26 जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. राज्य कृतिदलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके दिलेल्या माहितीनुसार या दोन टप्प्यात बालकांना डिसेंबरमध्ये पहिली मात्रा तर जानेवारीमध्ये दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.
विशेष लसीकरण अभियान
राज्यात गोवर – रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभिनयांनासाठी राज्यभरातील बालकांची गणना केली जाते आहे. जिल्हा, तालुका, पालिका आणि नगरपालिकासह विभागनिहाय अगदी वॉर्डनिहाय बालकांची मोजणी केली जाणार आहे. या अभियानातर्गंत एकही लस न घेतलेल्या बालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मिशन गोवर 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे.
