केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी धाराशिव शासकीय रुग्णालयास भेट देत तेथील यंत्रणेचा पंचनामा केलाय. यावेळी शासकीय रुग्णालयात काही औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला कर्मचारी देत असल्याचे समोर आले आहे. यावेळी भारती पवार यांनी स्वतः रांगेत उभा राहत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनाही बाहेरच्या मेडिकलमधून औषधे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रुग्णालयात औषधे का उपलब्ध नाहीत असा सवालही यावेळी भारती पवार यांनी कर्मचाऱ्यांना विचारला आहे.
आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने खळबळ उडाली आहे. खुद्द केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच ही सर्व परिस्थिती उजेडात आणली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार अचानकच उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या एका रुग्णाच्या औषधांची चिठ्ठी घेऊन भारती पाटील रांगेत उभ्या राहिल्या. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने कॅल्शियमची गोळी उपलब्ध नसल्याचे सांगत बाहेरून घेण्यास सांगितले. त्यानंतर भारती पवार यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली.
दरम्यान यानंतर कर्मचाऱ्यांनी औषधे रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगताच भारती पवार यांनी त्यांना चांगलेलच झापले. यावेळी इतर रुग्णांनीही भारती पवार यांच्याकडे औषधे उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी केल्या. या सर्व प्रकारानंतर भारती पवार यांनी तात्काळ बैठक घेत औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
